![]() |
| हरितक्रांतीनंतर सेंद्रिय क्रांतीची गरज |
भारत हा कृषिप्रधान देश असून आजही देशातील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. देशाची लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने अन्नधान्याची मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या सुमारे १६५ कोटींच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, शेती उत्पादन वाढविणे अपरिहार्य ठरते.
सेंद्रिय खतांचा शाश्वत शेतीतील वाढता महत्त्वपूर्ण वाटा
हरितक्रांतीनंतर भारतात रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. सुरुवातीच्या काळात या खतांमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली; मात्र दीर्घकालीन आणि अतिरेकी वापरामुळे जमिनीची सुपीकता, जैविक आरोग्य व नैसर्गिक संतुलन बिघडू लागले आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटणे, माती कठीण होणे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होणे, सूक्ष्मजीवांची संख्या घटणे यांसारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय खतांचा वापर हा केवळ पर्याय नसून, शाश्वत शेतीसाठी आवश्यक मार्ग ठरत आहे. सेंद्रिय खते जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारून दीर्घकाळ उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यास मदत करतात.
सेंद्रिय खते : संकल्पना व स्वरूप
सेंद्रिय खते म्हणजे वनस्पती व प्राण्यांपासून मिळणार्या नैसर्गिक पदार्थांचे कुजलेले किंवा विघटित स्वरूप. यामध्ये शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, हिरवळीचे खत, पिकांचे अवशेष, जैवखते, शेतीतील कचरा, सेंद्रिय अवशेष, मृत व जिवंत सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. हे सर्व घटक जमिनीत सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने विघटित होतात आणि त्यातून पिकांना आवश्यक असणारी अन्नद्रव्ये हळूहळू उपलब्ध होतात. त्यामुळे पिकांना अन्नद्रव्यांचा सातत्यपूर्ण व संतुलित पुरवठा होतो.
सेंद्रिय खतांचे जमिनीवरील एकूण परिणाम
सेंद्रिय खते ही केवळ अन्नद्रव्यांचा स्रोत नसून ती जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म नियंत्रित करणारी व सुधारणा करणारी साधने आहेत. सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील अविद्राव्य अन्नद्रव्ये विद्राव्य स्वरूपात रूपांतरित होतात. तसेच कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके (Pesticides, Herbicides, Fungicides) यांसारख्या हानिकारक रसायनांचे अवशेष विघटित होऊन पिकांवरील दुष्परिणाम कमी होतात. सेंद्रिय खतांचा वापर मातीची धूप कमी करतो, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवतो आणि पर्यावरणपूरक शेतीस चालना देतो.
सेंद्रिय खतांमुळे मातीच्या भौतिक गुणधर्मांमध्ये होणार्या सुधारणा
सेंद्रिय खतांचा जमिनीच्या भौतिक रचनेवर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो.
- १) जमिनीची जलधारण क्षमता वाढते, त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही पिकांना आवश्यक ओलावा उपलब्ध राहतो.
- २) जमिनीची जलवाहकता सुधारते, ज्यामुळे अतिरिक्त पाणी साचत नाही.
- ३) मातीची पोत व संरचना सुधारते, जमीन भुसभुशीत होते.
- ४) जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते.
- ५) योग्य निचर्यामुळे मुळांना कुजण्यापासून संरक्षण मिळते.
- ६) मातीची घनता कमी होऊन जमिनीत हवा व पाण्याचा समतोल राखला जातो.
- ७) मशागत सुलभ होते व पिकांची मुळे खोलवर पसरतात.
सेंद्रिय खतांमुळे मातीच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये होणार्या सुधारणा
सेंद्रिय खते जमिनीच्या रासायनिक संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतात.
- १) जमिनीतील क्षारता कमी होते.
- २) जमिनीचा सामू (पीएच) नियंत्रित राहतो, आम्लीय किंवा क्षारीय जमिनीत सुधारणा होते.
- ३) नत्र, स्फुरद व पालाश ही प्रमुख अन्नद्रव्ये हळूहळू व प्रभावीपणे उपलब्ध होतात.
- ४) लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरॉन यांसारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
- ५) अन्नद्रव्ये धुवून जाण्याऐवजी जमिनीत धरून ठेवली जातात.
- ६) स्थिर स्फुरद विद्राव्य स्वरूपात रूपांतरित होते.
- ७) हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण होण्यास मदत होते.
सेंद्रिय खतांमुळे मातीच्या जैविक गुणधर्मांमध्ये होणार्या सुधारणा
जमिनीचे खरे आरोग्य तिच्या जैविक घटकांवर अवलंबून असते.
- १) जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढते.
- २) सेंद्रिय कर्ब हा सूक्ष्मजीवांसाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत ठरतो.
- ३) मातीतील जैविक क्रियाशीलता वाढते.
- ४) नत्र स्थिरीकरण व स्फुरद विद्राव्यीकरण प्रभावीपणे होते.
- ५) विघटन प्रक्रियेतून प्रथिने, जीवनसत्त्वे, वाढ संप्रेरके, विकरे, प्रतिजैविके तयार होतात.
- ६) पी.एस.बी., ऍझेटोबॅक्टर, रायझोबियम, ऍझोस्पिरिलियम (Azotobacter, Rhizobium, Azospirillum) यांसारख्या उपयुक्त जीवाणूंची वाढ होते.
- ७) पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
सेंद्रिय शेती व आधुनिक काळ
आज केंद्र व राज्य शासन सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहे. परंपरागत कृषी विकास योजना (PKVY), भारतीय नैसर्गिक शेती पद्धत (BPKP) यांसारख्या योजनांतून सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. महाराष्ट्र, सिक्कीम, उत्तराखंड यांसारख्या राज्यांमध्ये सेंद्रिय शेती वेगाने विस्तारत आहे. सेंद्रिय उत्पादनांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.
सेंद्रिय खते: स्वरूप आणि प्रकार
सेंद्रिय खते म्हणजे नैसर्गिक स्रोतांवर आधारित खतं जी मातीची जैविक क्षमता वाढवतात, रासायनिक अवशेष कमी करतात आणि दीर्घकालीन मातीचे आरोग्य सुधारतात; प्रमुख स्वरूपांमध्ये कंपोस्ट, शेणखत, वर्मीकॉम्पोस्ट आणि बायोफर्टिलायझर्स येतात.
शेणखत (FYM - Farm Yard Manure):
जनावरांचे शेण, मूत्र, गवत, पेंढा आणि इतर शेतातील कचऱ्याच्या कुजण्याने हे खत तयार होते, ज्यामुळे मातीचा कस सुधारतो आणि पिकांना आवश्यक सूक्ष्म व स्थूल पोषक तत्वे मिळतात. या खताच्या उपयोगाने मातीची संरचना व पोषक उपलब्धता सुधारते.
कंपोस्ट:
शेतातील पिकावशेष, किचन वेस्ट यांचे नियंत्रित विघटन म्हणजे कंपोस्ट खत होय. हे खत मातीतील सूक्ष्मजीव वाढवते आणि पोषकांची हळूहळू उपलब्धता देते.
गांडूळ खत (Vermicompost) :
गांडुळाद्वारे तयार केलेले सुपीक; उच्च पोषक घनता आणि सूक्ष्मजीव समृद्धी सलिल खत होय. हे खत पिकांच्या वाढीस खूप उपयुक्त असते.
जैविक खते (Biofertilizers) :
नायट्रोजन-फिक्सिंग बॅक्टेरिया, फॉस्फेट-सॉल्युबिलायझर इत्यादी जीवाणू; मातीतील पोषक चक्रात थेट सहभाग घेतात आणि रासायनिक खतांची गरज कमी करतात.
तरल सेंद्रिय खते व इतर उत्पादने:
पाण्यात विरघळणारी जैविक अर्के, बायोस्टिम्युलेन्ट्स; पातळीवर पोषण व रोग‑प्रतिरोधक क्षमता वाढवतात.
रासायनिक खतांवर अवलंबून असलेली शेती दीर्घकालीन दृष्टिकोनातून टिकाऊ नाही. जमिनीचे आरोग्य, पर्यावरणाचे संरक्षण, मानवी आरोग्य आणि शेतकर्यांचे आर्थिक स्थैर्य या सर्व बाबी लक्षात घेता सेंद्रिय खतांचा वापर अत्यावश्यक आहे. सेंद्रिय खतांचा मुख्य उद्देश मातीतील जैविक क्रिया वाढवणे, पोषकांचे नैसर्गिक चक्र सुसंगत करणे आणि पर्यावरणीय शाश्वतता साधणे हा आहे. दीर्घकालीन दृष्टीने मातीतील कार्बन साठा वाढवणे हे महत्त्वाचे आहे. सेंद्रिय खते जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारून उत्पादनक्षमता वाढवतातच, शिवाय शेतीला शाश्वत व पर्यावरणपूरक बनवतात. त्यामुळे भविष्यातील अन्नसुरक्षेसाठी, नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी सुपीक जमीन टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा स्वीकार ही काळाची गरज आहे.
